Sunday 10 June 2018

जंगलातल्या प्रकाशवाटा..!

संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या मागे नक्षलवादी शक्तींचा हात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी कबीर कला मंच व रिपब्लिकन पंथार्सच्या कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकल्या, व त्यात हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ५ संशयित आरोपींना अटक केली. साहजिकच या अटकसत्रानंतर डाव्या माओवादी गटांत खळबळ उडाली. अपेक्षेप्रमाणे अटकेनंतर काही तासातच विविध भागात निदर्शने, घोषणाबाजी सुरू झाली. आणि पुरोगामी विचारवंतांच्या लोकशाहीची हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधान धोक्यात आहे अशा सारखं ऐकून बोर झालेल्या आरोळ्या कानावर पडल्या.
आम्ही म्हणतो त्याला अटक करा म्हणणारे डावे, त्यांच्यावर चौकशीअंती झालेल्या कारवाईवर आता अरण्यरुदन करत आहेत. ते साहजिक आहे. परंतु माओवाद्यांच्या या अटकेने मिलिंद तेलतुंबडेला झालं नसेल त्यापेक्षा जास्त दुःख प्रकाश आंबेडकरांना झालं आहे. प्रकाशरावांच्या मागच्या काही वर्षातल्या भूमिका पहिल्या तर एक गोष्ट लक्षात येईन टी म्हणजे त्यांना नक्षलवाद्यांविषयी असलेली सहानुभूती ही नवी नाही. त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे मावोवाद्याना पूरक भूमिका घेतल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांनी कम्युनिस्ट पार्टी सोबतही राजकीय युती करण्यास काही हरकत नाही ती त्यांची राजकीय भूमिका आपण समजू शकतो. परंतु देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठं आव्हान देणाऱ्या मावोवादी शक्तींशी त्याचं नाव जोडलं जात आहे ह्ये गंभीर आहे. आजवर त्यांच्यावर अनेकवेळा असे आरोप झाले परंतु त्यांनी एकदाही अशा आरोपांचे खंडन केले नाही तर, “हो आहे मी नक्षलवादी काय करायचंय ते करा...!” अशी आडमुठी भूमिका घेतली. एकवेळ मी असंही म्हणेन कि प्रकाशरावांनी तशी भूमिका घ्यायला देखील हरकत नाही, परंतु ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला त्यांच्या बद्दल आस्था आहे आणि त्यांच्या अशा नक्षलसमर्थक भूमिकेमुळे आंबेडकरी समाजाची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
प्रकाश आंबेडकरांचे मेव्हणे डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवाद्यांच्या फ्रंट ओर्गनायजेशन मध्ये सक्रीय असल्याचे गंभीर आरोप आहेत व तसेच त्यांचे बंधू मिलिंद तेलतुंबडे हे कुख्यात नक्षलवादी आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या नात्यातील काही लोक नक्षलवादी चळवळीशी संबधित असल्यामुळे त्यांच्यावर संशय घेणं नक्कीच चुकीचं आहे परंतु त्यांच्या एकंदर भूमिका नेहमीच संदिग्ध राहिल्या आहेत.  
२०११ साली महाराष्ट्र पोलिसांनी जेव्हा अन्जेला सोनटक्के, ज्या कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेच्या पत्नी व मावोवाद्यांच्या महाराष्ट्र स्टेट कमिटीच्या सदस्य आहेत यांना अटक केली होती त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी, “सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून उच्च शिक्षित व्यक्तीला नक्षलवादी ठरवून बदनाम करत आहे.” अशी भूमिका घेतली. त्यावेळ राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी प्रणीत तथाकथित सेक्युलर सरकार होते. अन्जेला ज्या नक्षलवादी चळवळीत कविता, इस्कारा, संगीता, रमा अशा अनेक नावानी परिचित आहेत आणि त्याच्या विरुध्द सबळ पुरावे असताना देखील प्रकाश आंबेडकरांसारख्या जबाबदार व्यक्तीने त्यांची बाजू घेणं नक्कीच आश्चर्यकारक आणि संशयास्पद आहे.
२०१३ साली नक्षलवादाशी संबधित असलेल्या कबीर कला मंच  च्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला पत्र लिहिलं होतं. ज्यांच्या सुटके साठी सरकारला धारेवर धरलं होतं त्या शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या जंगलातल्या वावरावर आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी गोपी याने शिक्कामोर्तब केलं होतं. ज्या कबीर कला मंचच्या नक्षलवादी संबंधावर ATS ने देखील मोहोर लावली आहे त्या KKM बद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात, “कबीर कला मंच ला बदनाम करण्याचा हा पोलिसांचा डाव आहे, पोलिसांचे सर्व रिपोर्ट खोटे आहेत, कबीर कला  मंच हा फक्त कलाकारांचा ग्रुप आहे, त्यांचा नक्षलवादाशी संबंध नाही.”
याच्याही एक पाउल पुढ जात २०१३ च्या जून महिन्यात जळगाव मध्ये आयोजित त्यांच्या पक्ष मेळाव्यात, “नक्षलवादी हे देशाचे खरे मित्र आहेत. परंतु सरकार शत्रू समजून त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही. नक्षलवाद्यांमध्ये काही बुद्धिवादी लोक आहेत..!” अशा शब्दात नक्षलवाद्यांचे जाहीर समर्थन केले. एवढ्यावर न थांबता ते पुढे म्हणाले कि, “कॉँग्रेसने सलवा जुडूमसारखी संघटना तयार करून 60 हजार नक्षलवादी व आदिवासींना ठार मारले. छत्तीसगड हल्ल्यातील आरोपी मिलिंद तेलतुंबडे हा माझा नातेवाईक आहे, परंतु तो त्याचे काम करीत आहे, मी माझे काम करत आहे.” प्रकाश आंबेडकराच्या अश्या भूमिकांमुळे दलित चळवळ नक्षलवाद्यांकडून हायजक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना त्यांचा तसा प्रयत्नच सुरु आहे अस म्हणणं वावगं ठरणार नाही.
२०१० साली नागपूर येथे चंद्रपूर पोलिसांनी बंडू मेश्राम आणि रामकुमार अक्कीपल्ली या दोघांना नक्षल संबंध असण्याच्या संशयावरून अटक केली होती त्यावेळी देखील त्यांच्या सुटकेसाठी प्रकाशरावांनी हात पाय मारल्याची चर्चा त्यावेळी माध्यमात रंगली होती.
सध्या अटकेत नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सुधीर ढवळे याने राउंड टेबल नावाच्या वेबसाईट ला एक मुलाखत दिली होती त्यात दलित चळवळीवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणतो कि, “प्रकाश आंबेडकरांच्या मते दलित चळवळ मृत झालेली आहे, आणि मलाही तसच वाटतं. म्हणून आपण आता नवीन मार्गाचा अवलंब केला पाहिजे.” नवीन मार्ग कोणता हे ढवळे स्पष्ट सांगत नाही परंतु मावोवादी विचार जोपासणाऱ्या ढवळेचा रोख नक्कीच सशस्त्र आणि हिंसकच आहे हे वेगळ सांगायची गरज नाही.
कालच्या तपासात मावोद्यांचा जो पत्रव्यावहार पोलिसांच्या हाती लागला आहे त्यात देखील रोना विल्सन, जिग्नेश मेवानी, उमर खालिद, आनंद तेलतुंबडे यांच्या सोबत प्रकाश आंबेडकर यांचे देखील नाव आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. 
प्रकाश आंबेडकरांच्या या सर्व भूमिका आपण पाहिल्या तर नक्कीच संशयाला जागा आहे. प्रकाश आंबेडकरानी जंगलात जाऊन प्रशिक्षण घेतलं तरी आम्हाला हरकत नाही, परंतु त्यांनी दलित चळवळीला नक्षलवादाच्या दावणीला बंधू नये एवढीच माफक अपेक्षा.
जय भीम
(सदर लेख साप्ताहिक चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे)

No comments:

Post a Comment